डहाणू : लाटांच्या माऱ्यामुळे झालेली किनाऱ्याची झीज भरून निघण्यासाठी गुंगवाडा आणि चिखले या दोन ठिकाणी धूपप्रतिबंधक बंधारे बांधण्यात येणार आहेत. गुंगवाडा येथे १२५ मीटरचा दगडी बंधारा तर चिखले येथे २०० मीटरचा बंधारा बांधण्यात येणार आहे. जियो कंटेनर बॅगमध्ये वाळू भरून बांधण्यात येणाऱ्या या बंधाऱ्यांमुळे किनाऱ्यावरील घरे, सुरूच्या बागांचे रक्षण होईल, अशी आशा आहे. त्याचबरोबर वरोर, वाढवण, चिंचणी येथेही दगडी बंधारे बांधण्याची मागणी होत आहे.
डहाणू तालुक्यातील चिखले गावात किनाऱ्यावर जियो कंटेनर बॅगमध्ये वाळू भरून २०० मीटर लांबीचा बंधारा बांधला जात आहे. तो ४० लाखांच्या वर असणार आहे. या पद्धतीचा बंधारा यापूर्वी केळवे किनाऱ्यावर बांधण्यात आला होता. तर गुंगवाडा येथे १२५ कोटींचा बंधारा बांधला जाणार आहे. त्यासाठी एक कोटी २० लाखांचा खर्च अपेक्षित आहे. डहाणू किनाऱ्यावरील रेतीची अवैध तस्करी आणि उत्खननामुळे समुद्रकिनारे खचण्याचे प्रमाण वाढतच आहे. डहाणूजवळ समुद्रातून केल्या जाणाऱ्या वाळू उपशावर लाखोंची उलाढाल होत असल्याच्या चर्चा आहेत. या अवैध रेती उत्खननामुळे सतिपाडा अणि चिखले येथे मोठमोठाले खड्डे तयार झाले आहेत. तसेच सुरुच्या बनांची आणि किनाऱ्यांचीही मोठय़ा प्रमाणात हानी होत आहे.
0 Comments