लातूर - शेतमालक आणि त्याच्या भावाने शेतातील महिलेवर सामुहिक बलात्कार केला असून यात खुद्द नवऱ्याची साथ मिळाली असल्याचा धक्कादायक प्रकार लातूर जिल्ह्यातील औसा इथं समोर आला आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे, अत्याचारानंतर पीडित महिलेने तब्बल १० ते १५ किलोमिटर चालत मध्यरात्री लातुरच्या (Latur) दोन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र पीडित महिलेला मदत मिळाली नाही. अखेर पोलीस (Police) अधिक्षकांच्या सुचनेनंतर पतीसह तिघांविरुध्द औसा पोलिसांत बलात्कार आणि अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील रहिवासी असलेली एक ३२ वर्षीय महिला पतीसह औसा तालुक्यातील सारोळा रोडवर असलेल्या एका पानमळ्यात सालगडी म्हणून वास्तव्यास होते. काही दिवसांपूर्वी या पती-पत्नीमध्ये वाद झाल्यामुळे ही महिला लातूरातील आपल्या आईकडे वास्तव्यास होती. वाद निवळल्यानंतर पिडीत महिलेच्या आईने ९ एप्रिल रोजी या महिलेस पतीकडे सोडले.
रात्री ९ वाजेच्या सुमारास पिडीत महिलेच्या पतीने पानमळ्याचे मालक असलेले इल्लु शेख आणि मुसा शेख या दोघांना घरी आनले आणि त्यांना स्वतःच्या पत्नीवर अत्याचार करण्यास सांगीतले. त्यानुसार पतीसमोरच या महिलेवर दोघांनी अत्याचार केला. घटनेनंतर पिडित महिला घटनास्थळावरुन मध्यरात्री बाभळगाव नाक्यावर असलेल्या ग्रामीण पोलीस ठाणे आणि विवेकानंद चौक पोलीस ठाणे गाठले परंतू त्यांनी पोलीस अधिक्षकांकडे जाण्याचा सल्ला दिला.
त्यामुळे सदर महिलेने आईला सोबत घेवून पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. स्वतःवरील अत्याचाराची कर्मकहाणी ऐकवल्यानंतर अधिक्षकांनी औसा पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आरोपी पतीसह अन्य दोघांविरुध्द औसा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
0 Comments