गडचिरोली: करोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी राज्यात उचित प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु असून राज्यात ०२ एप्रिल रोजी गुडीपाडवा, तर १० एप्रिल रोजी श्रीराम नवमी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. तसेच काही राजकीय पक्ष, संघटना व इतर नागरिक उत्सव, सभा, मिरवणुकीसारखे सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेता सदर कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात २७ मार्च २०२२ ते १० एप्रिल २०२२ या कालावधित जमावबंदीचा आदेश लागू करण्यात येत आहे
जमावबंदीच्या या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी समाजविरोधी कृतींना मनाई करणे व अव्यवस्थेला प्रतिबंध उपाय करणे आवश्यक असल्याने पोलिसांनी काही गोष्टींना मनाई केली आहे. त्यात शस्त्र, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठया किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी इतर कोणतीही वस्तु बरोबर नेणे, कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्र सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, किंवा जमा करणे किंवा तयार करणे यांवर प्रतिबंध घालण्यात आले आहे.
व्यक्तीच्या किंवा प्रेताच्या आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे, ज्यामुळे सभ्यता अगर नीतीमत्ता यास धक्का पोहचेल अशी किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा ज्यामध्ये उलथवून टाकण्याची प्रवृत्ती दिसून येत असेल, अशी आवेशपूर्ण भाषणे करणे, हावभाव करणे, अगर सोंग आणणे आणि अशी चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणताही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे त्याचे प्रदर्शन करणे किंवा त्याचा जनतेत प्रसार करणे अशा गोष्टींना प्रतिबंध करण्यात आला आहे.
उपविभागीय दंडाधिकारी, कार्यकारी दंडाधिकारी अथवा संबंधित पोलिस स्टेशन अधिकारी यांच्या पूर्व परवानगी शिवाय कोणीही मिरवणूक काढू नये. पाच व्यक्ती किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती सार्वजनिक जागेत सार्वजनिक रस्त्यावर किंवा सार्वजनिक चावडीवर दिनांक २७ मार्च २०२२ ते १० एप्रिल २०२२ या कालावधीत जमा होणार नाहीत किंवा कोणतेही कार्यक्रम आयोजित करणार नाहीत. हा आदेश दिनांक २७ मार्च रात्री १२ वाजून ०१ मिनिटांपासून ते १० एप्रिल २०२२ च्या रात्री १२ वाजेपर्यंत संपूर्ण गडचिरोली जिल्हयाच्या क्षेत्राकरीता लागू राहील, असे गडचिरोली जिल्ह्याच्या जिल्हादंडाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे.
0 Comments