वरात घेऊन निघाला मात्र रस्त्यातच केलं भलतंच कांड अन् थेट रुग्णालयात पोहोचला नवरदेव, नवरीने मोडलं लग्न

नवरदेवाने आपली वरात मध्येच थांबवली आणि मित्रांसोबत दारू पिण्यास सुरुवात केली. त्यानंतर अचानक तब्येत बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं

भारतात लग्नाचा सीझन सुरू आहे. कोरोनामुळे गेल्या 2 वर्षांपासून लग्नसमारंभ थाटामाटात होत नव्हते. अगदी मोजक्या लोकांमध्ये आणि शांततेत विवाह होत होते. मात्र सध्या कोणत्याही प्रकारची बंधनं आणि नियम नाहीत. त्यामुळे विवाहसोहळ्यांचं वैभव परत आलं आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यातील निचलौल पोलीस स्टेशन परिसरात एका लग्नसोहळ्याची रोषणाई त्यावेळी ओसरली जेव्हा वराची घरातून मिरवणूक निघाली, मात्र तो वधूच्या घरी म्हणजेच सासरच्या घरी न पोहोचता, थेट रुग्णालयात पोहोचला.
नवरदेवाने आपली वरात मध्येच थांबवली आणि मित्रांसोबत दारू पिण्यास सुरुवात केली. त्यानंतर अचानक तब्येत बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं. यानंतर नवरदेवाला रुग्णालयात दाखल केल्याची माहिती वधूच्या कुटुंबीयांना समजताच नवरीच्या घरात एकच खळबळ उडाली. मुलीच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात धाव घेऊन वराच्या प्रकृतीची माहिती घेतली. यादरम्यान दारू पिल्याने त्याची तब्येत बिघडल्याचं समजताच वधूने लग्नास नकार दिला यानंतर वरात लग्नाशिवायच माघारी परतली.
हे संपूर्ण प्रकरण निचलौल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील आहे, ज्यात बृजमानगंज येथून वरात येणार होती. वधूपक्षाकडील लोकांनी वरातीत येणाऱ्या लोकांच्या स्वागताची सर्व तयारी पूर्ण केली होती. सगळे नवरदेवाच्या येण्याची वाट पाहात होते, मात्र वरात घरी पोहोचण्याआधीच नवरदेव दारू पित असल्याचं समजलं. नवरदेवाची तब्येत बिघडल्याने त्याला सीएससी निचलौलमध्ये दाखल करण्यात आलं.
घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर दोन्ही पक्षांनी मिळून हे लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. निचलौलचे ठाणेदार रामग्य सिंह यांनी सांगितलं की, दोन्ही पक्ष एकमेकांचे दूरचे नातेवाईकच होते. त्यामुळे त्यांनी सामंजस्याने हे प्रकरण मिटवलं आहे. दोन्ही पक्ष एकमेकांवर कारवाई करू इच्छित नव्हते, त्यामुळे या प्रकरणात कोणतीही कायदेशीर कारवाई झाली नाही.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e