मुंबई : राज्यात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर समुद्र, नदी, तलावाच्या ठिकाणी पर्यटकांची संख्या वाढत आहे. मात्र, या ठिकाणी पाण्यात पोहणे काही पर्यटकांच्या जीवावर बेतत आहे. राज्यात आज, रविवारी नागपुरात अंबाझरी तलावात बुडून दोघांचा मृत्यू तर रायगडमध्ये कुंडलिका नदीत बुडून एकाचा मृत्यू झाला आहे. राज्यात पर्यटकांचे नदी-तलावात बुडून मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे समुद्र, नदी, तलावाच्या ठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
आज, रविवारी नागपूरच्या अंबाझरी तलावात पोहायला गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू झाला आहे. नागपुरातील चौघे जण फिरायला गेले होते, त्यावेळी त्यांना तलावात पोहण्याचा मोह आवरला नाही. मात्र, पाण्यात उतरल्यानंतर चौघांपैकी दोघांना पोहता येत नसल्याने ते बुडाले. त्यानंतर त्यांना शोधण्यासाठी बचाव पथक आणि पोलिसांनी तलावात बोट टाकत त्यांचा शोध घेतला. मात्र, काही वेळाने त्यांचे मृतदेह हाती आले. त्यांच्या मृत्यूने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
रायगडमध्ये पाण्यात बुडून पर्यटकाचा मृत्यू
दुसरीकडे पावसाळा सुरु झाल्याने रायगडमधील नदी-नाले वाहू लागले आहेत. या नदीतील पाण्यामध्ये मौजमजा करण्यासाठी ठाणे येथून आलेल्या पर्यटकाचा माणगाव तालुक्यातील कुंडलिका नदीत बुडून मृत्यू झाला आहे. दिनेश तुकाराम शिंदे असे २४ वर्षीय युवकाचे नाव आहे. मृत पर्यटक ठाणे जिल्ह्यातील रहिवाशी आहे.
दिनेश हा ठाणे येथून आपल्या १७ मित्रांसह माणगाव तालुक्यात पावसाळी पर्यटनासाठी आला होता. म्हसैवाडी येथील कुंडलिका नदी पात्रात पोहण्यासाठी गेला असता दिनेश शिंदे, संदिप ताबेकर आणि हर्षद मेहंदे या तिघांना नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले. संदीप आणि हर्षद याला बचावण्यात यश आले आहे. मात्र, दिनेश याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. दिनेश याचा मृतदेह माणगाव उप जिल्हा रुग्णालयामध्ये आणण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा माणगाव पोलीस तपास करत आहेत.
0 Comments