खाल्ल्या मिठाला जागा म्हणणाऱ्या सुप्रिया सुळेंना सुजय विखे पाटलांचं उत्तर, म्हणाले “जे कधीच कुणाच्या मिठाला…”

लोकसभेत शुक्रवारी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि भाजपा खासदार सुजय विखे पाटील यांच्या कलगीतुरा रंगल्याचं पहायला मिळालं. महाराष्ट्रातील सहकार क्षेत्र, साखर कारखाने, त्यांची अवस्था आणि त्यांच्या घेतल्या जाणाऱ्या कथित राजकीय फायद्यावरुन संसदेत चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार प्रस्तावावर बोलताना यावेळी सुजय विखे पाटील आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रावरून जोरदार कलगीतुरा रंगताना पाहायला मिळाला. सुजय विखे पाटील यांनी युपीएवर आरोप केला असता सुप्रिया सुळे यांनी यावेळी १० वर्ष तुम्ही ज्यांच्यासोबत होते, गांधी घराण्यासोबत तुमचे जवळचे संबंध होते, ते कदाचित तुम्ही विसरले असाल असं म्हणत खाल्ल्या मिठाला जागा अशी टीका केली होती. त्यांच्या या टीकेला आता सुजय विखे पाटील यांनी उत्तर दिलं आहे.राहता येथील कार्यक्रमात बोलताना सुजय विखे पाटील यांनी पवार कुटुंबीयांचं नाव न घेता उत्तर दिलं. ते म्हणाले की, “आम्ही मिठाला जागावं की नाही, हे जे कधीच कुणाच्या मिठाला जागले नाहीत त्यांनी शिकवू नये”. “राधाकृष्ण विखे पाटील किंवा स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील हे कोणत्या पक्षाच्या जिवावर नव्हे तर गोरगरिब जनतेने मतदान केलं असल्याने राजकारणात टिकून आहेत,” असा टोला लगावला.

“लोकसभेत भाषण करताना मी कोणाचंही नाव घेतलं नव्हत. मी फक्त युपीएच्या सहकार क्षेत्राविषयी बोलत होतो. ज्यांनी सहकार क्षेत्र बुडवलं तेचं आज त्याला उभारी देण्याचा प्रयत्न करत असल्याचं मी सांगितलं,” असं त्यांनी म्हटलं. तसंच जे अळूच्या वड्या खातात त्यांचाच घसा खवखव करतो असाही टोला लगावला.

लोकसभेत नेमकं काय झालं ?

राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावरील चर्चेदरम्यान विरोधकांनी स्टार्टअप इंडिया, आत्मनिर्भर भारत या सरकारी योजनांविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर त्यावर सुजय विखे पाटील यांनी आक्षेप घेतला. “स्टार्टअप इंडिया, आत्मनिर्भर भारत, शेतकरी सशक्तीकरण हे सगळं सुरूच सहकारी चळवळीतून झालं. मी अशा परिवारात जन्माला आलो, जिथे माझे पणजोबा कैलासवासी विठ्ठलराव विखे पाटील यांनी आशियातला पहिला सहकारी साखर कारखाना सुरू केला. हा स्टार्टअप इंडिया त्यांना दिसू शकला नाही. कारण यूपीए एक आणि दोनमध्ये सर्व साखर कारखान्यांना शेतकऱ्यांना एफआरपी देण्यासाठी कर्ज घेण्यासाठी भाग पाडलं गेलं”, असा आरोप सुजय विखे पाटील यांनी केले 

“मंत्री साखर कारखान्यांचे मालक झालेत”

“यूपीएच्या १० वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातील सर्व साखर कारखाने बंद केले. आज राज्यातल्या ७० टक्के मंत्र्यांनी याच बंद कारखान्यांना फार कमी दरात खरेदी केलं आणि आज ते त्यांचे मालक होऊन बसले आहेत”, असा देखील दावा सुजय विखे पाटलांनी केला.

त्यांनी वडिलांविरोधातच टीका केलीये – सुप्रिया सुळे

दरम्यान, यानंतर बोलायला उभ्या राहिलेल्या सुप्रिया सुळेंनी या आरोपांवरून सुजय विखे पाटलांना टोला लगावला. “यूपीए एक आणि यूपीए दोन विषयी सुजय विखे पाटील खूप काही बोलले. बोलण्याचा त्यांचा अधिकार आहे. पण मी फक्त त्यांना आठवण करून देऊ इच्छिते की यूपीए एक आणि दोन मध्ये त्यांचे वडील सरकारमध्ये मंत्री होते. त्यामुळे सर्व धोरणं निश्चित झाली तेव्हा ते काँग्रेसमध्येच होते. त्यामुळे त्यांनी जी काही टीका केलीये, ती आपल्याच वडिलांविरोधात केली आहे”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या “हे आपल्या संस्कृतीत बसत नाही. मराठीत म्हणतात खाल्ल्या मिठाला जागा. कधीही कुणाचंही अगदी २ रुपयांचं जरी खाल्लं असेल, तर त्याला नेहमीच लक्षात ठेवा ही माझी संस्कृती आहे, हे मला माझ्या आईने शिकवलं आहे. त्यामुळे १० वर्ष तुम्ही ज्यांच्यासोबत होते, गांधी घराण्यासोबत तुमचे जवळचे संबंध होते, ते कदाचित तुम्ही विसरले असाल. पण ही त्याची पार्श्वभूमी आहे”, असं देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e