नाशिक : नाशिकमध्ये एका आश्रमशाळेमध्ये विद्यार्थिनीला मासिक पाळी आली म्हणून वृक्षारोपण करण्यास मनाई केली. ही घटना ताजी असताना पेठ आश्रम शाळेत एका 16 वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळा इथं ही घटना घडली आहे. भारती महादू बेंडकोळी (वय 16) असं आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. पहाटेच्या सुमारास भारतीने आश्रम शाळेतील छताला असलेल्या पंखा अडकवण्याचा हुकाला दोरी बांधली आणि गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. आश्रम शाळेच्या वसतिगृहातील खोलीत गळफास घेतल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. भारतीने इतक्या टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
घटनेची माहिती मिळताच हरसूल ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. भारतीचा मृतदेह ताब्यात घेतला असून हरसूल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
विशेष म्हणजे, आत्महत्येची घटना झाली तेव्हा शाळेत पहारेकरी अथवा मुख्यालयातील शिक्षक उपस्थित नसल्याने या प्रकरणाची चौकशी करण्याची ग्रामस्थांनी मागणी केली आहे. आदिवासी आश्रमशाळेत एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्यामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. भारतीने गळफास घेऊन आत्महत्या का केली हे मात्र अद्याप समजू शकले नाही. पोलीस निरीक्षक विशाल जगन्नाथ जाधव यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
0 Comments