अयोध्येतील राम मंदिर पुन्हा एकदा दहशतवादी संघटनांच्या रडारवर असल्याचं समोर आलंय. देशविघातक कारवाया आणि सामाजिक अशांतता निर्माण करण्याच्या आरोपाखाली पॉप्युलर फ्रंड ऑफ इंडिया अर्थात PFI च्या अटक करण्यात आलेल्या संशयितांच्या चौकशीतून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. PFI च्या मॉड्युलमध्ये २०४७ पर्यंत भारत देश संपूर्ण मुस्लीम राष्ट्र बनवण्यासह बाबरी मशिदीच्या जागी उभारण्यात येणारं राममंदिर पाडून पुन्हा तेथे मशिद उभारण्याचा डाव होता, असं चौकशीत समोर आलं आहे. अटकेत असलेल्या संशयितांनी परदेशात वास्तव्य केल्याचंही तपासात समोर आल्याची माहिती ATS ने न्यायालयात दिली आहे.
बंदी घातलेल्या ‘सीमी’च्या धर्तीवरच कामकाजाची पद्धत असलेल्या PFI वर २३ सप्टेंबरला देशभरात छापेमारी करण्यात आली. तर राज्यातील मालेगाव, पुणे, बीड आणि कोल्हापुरातून ५ जणांना अटक करण्यात आली होती. ATS ने अटक केलेल्या PFI च्या संशयितांपैकी अनेक जणांनी परदेश दौरे केले असून तिथं वास्तव्यही केलंय. त्यामुळे या संघटनेला परदेशातून मोठा आर्थिक फंड मिळत असावा अथवा संशयितांमध्येही आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय आहे.
तर संशयितांच्या हार्ड डिस्कमधूनही आणखी महत्वपूर्ण माहिती हाती लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे केवळ राम मंदिरच PFI च्या निशाण्यावर होते की देशभरात हल्ल्याचा आणखी मोठा कट PFI च्या डोक्यात शिजत होता? PFI च्या २०४७ मॉड्यूलमध्ये आणखी काय टार्गेट आहेत? असे अनेक प्रश्न अजून अनुत्तरित असून ATS च्या तपासातून लवकरच PFI चे सर्व मनसुबे उघड होण्याची शक्यता आहे
0 Comments